पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडून दाखवलेली ‘सुरतेची स्वारी’, स्वारी दरम्यान शिवाजी महाराजांनी घेतलेल्या सर्वधर्मीय काळजीचे प्रसंग, आई वडलांची काळजी घेत चला, वाचन करा, शिक्षणाशिवाय सारेच व्यर्थ आहे, असा बाबासाहेबांनी दिलेला संदेश आणि महाराष्ट्र गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहावेत, असे केलेलं आवाहन यामुळे ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तक प्रकाशन समारंभ आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वितरण समारंभ संस्मरणीय ठरला.
सुरतवाला फाउंडेशनच्यावतीने रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला लिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंपकलाल सुरतवाला होते. सुरेशचंद्र सुरतवाला यांनी त्यांच्या आई-वडिलांची कथा ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ या पुस्तकाद्वारे मांडली आहे.
या कार्यक्रमादरम्यान ‘रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘सुरतवाला फाउंडेशन’तर्फे चार लाख रुपयांची शिष्यवृत्तीचे वाटप होणार करण्यात आले. ही शिष्यवृत्ती शहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थीनींना मिळून, त्यांच्या उच्च शिक्षणाकरीता देण्यात येते. या उपक्रमाचे ४ थे वर्ष होते .
या वेळी नटवरलाल सुरतवाला, बळवंत जमनादास गांधी, माजी महापौर शांतीलाल बाबुभाई सुरतवाला, दिनेश हरिलाल सुरतवाला, जतीन धनसुखलाल सुरतवाला, जगमोहन रंगीलदास सुरतवाला (रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट), रमेश गोविंद वैद्य उपस्थित होते
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, ‘आई वडिलांच्या प्रति असलेल्या जिव्हाळ्याचे दर्शन या पुस्तकातून झाले आहे . विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. आई वडिलांप्रती आदर दाखवणे अत्यंत महत्वाचे आहे. सुरतवाला कुटुंबाचे पुण्यात योगदान आहे. शिकणाऱ्यांना मदत करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे . शिवाजी महाराजांच्या वकील मंडळात दोन गुजराती होते. तेव्हापासून महाराष्ट्राचे -गुजरातचे नाते जिव्हाळ्याचे होते . महाराजांनी सुरत लुटली कारण औरंगजेबाने स्वराज्याची लूट केली होती.ते सुरत लुटण्याकरिता लुटायला गेले नव्हते तर स्वराज्याला औरंगजेबापासून झालेल्या नुकसानीची भरपाई मागायला गेले होते. त्यांचा सरदार उर्मटपणे लागल्याने त्यांना सुरत लुटणे भाग पडले. या लुटीच्या बातम्या इंग्रजी,फ्रेंच वर्तमानपत्रात आल्या. इंग्रजी कारभाऱ्यानी सुरत लुटीच्या दरम्यान शिवाजी महाराजांनी धर्मस्थळांच्या दाखवलेल्या काळजीचे आणि संरक्षणाचे वर्णन केले आहे.हे करताना त्यांनी महिला, धर्मस्थळे यांची काळजी घेतली . महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहिले पाहिजेत. आपण एक आहोत ही भावना वृद्धिंगत केली पाहिजे’.
शांतीलाल सुरतवाला, सुरेशचंद्र सुरतवाला यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप निफाडकर यांनी सूत्रसंचालन केले.